पहिल्याच कंपनीत मी ट्रेनी म्हणून काम करत असताना शामसाहेब (नाव बदललेय) त्या कंपनीचे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते.

माझ्यापेक्षा १०/१२ वर्ष मोठे. नागपूरच्या VNIT मधून इंजिनियरींग केलेले.अत्यंत हुशार,तल्लख, आम्हाला लहान भावासारखे वागवायचे.

फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे, पाहिजे ते घ्या म्हणायचे आणि मग अक्षरश: धुमाकुळ… आम्हालाही जणू आमच्या घरातीलच माणसासारखे वाटायचे. माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे प्रमुख कारण हे त्यांच्यासोबतच्या अशा जेवणावळीच होत्या.

यात मी सांगितलेला पदार्थाचा इतिहास, भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा मला ते बाहेरच्या राज्यात जावूनही कुठे काय खावे हे मला विचारायचे.

त्यांना कामासाठी कधीही फोन करा, कितीही किचकट प्रश्न असला तरी कायम उत्तर तयारच असायची, फिल्डवर काम केलेले असल्याने अनुभव, थर्मल इंजिनियरींगचे परफेक्ट ज्ञान, जबरदस्त कष्ट करण्याची तयारी याच्या जोरावर त्यांची एक वेगळीच जरब होती.

पुढे मी मुंबईत आलो आणि आमच्या गाठीभेटी अजून वाढल्या, मी जरी त्यांच्या कंपनीत नसलो तरी त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन घेत असे.
पुढे साधारणपणे २००७ ला मी या ऊद्योग-व्यवसायात उतरलो.

सुरूवातीला त्यांनी मला विरोध केला होता कारण माझे वय कमी आणि कोणतेच आर्थिक पाठबळ नसल्याने खुप अडचणी येऊ शकतात, दुसरे मी करत असलेल्या व्यवसायास फार काही भविष्य नाही, हे त्यांचे ठाम मत होते.

मी त्यांचा सल्ला ऐकला नाही याचा राग येऊन त्यांनी वर्ष – दोनवर्ष माझ्याशी संपर्क तोडला.
मला याचे फार वाईट वाटायचे, बऱ्याचदा मी त्यांना फोन करायचो पण ते मला टाळायचे. पण काही कॅामन मित्रांकडे कायम माझी खुशाली विचारत असत.

साधारणपणे २००९ दरम्यान मला त्यांचा एक दिवस अचानक फोन आला “कसा आहेस? आणि मी तूला उद्या भेटायला येऊ का?”

मी कसलाही विचार न करता सर्व कामं बाजूला ठेवून त्यांना हो म्हटले.

मला खूप आनंद झाला होता कारण ते माझे तसे गुरूच होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता साहेब ॲाफीसमधे हजर, मस्त गप्पा झाल्या, त्यांना आमची प्रगती पाहून मनापासून आनंद झाला. दुपारी जेवण करताना त्यांनी मला अजून एक बातमी दिली ती म्हणजे त्यांनीही वर्षभरापूर्वी स्वत:चा बॅायलर बनविण्याचा उद्योग सूरू केलाय. नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही भरपूर जेवलो, पुर्वी ही तेच पैसे द्यायचे, त्या दिवशीही त्यांनीच पैसे दिले.

जायच्या वेळी मी त्यांना गुरूदक्षिणा म्हणून त्यांच्या व्यवसायास पुरक अशा आमच्याकडून मुद्दामच काही ॲार्डर्स दिल्या,
त्याचा बळेच संपुर्ण ॲडव्हान्सही देऊ केला. त्यांच्या डोळ्यात तो चेक घेताना अक्षरश: पाणी आले होते. मी मात्र अत्यंत सदभावनेनं आणि आपुलकीने शुभेच्छा देवून त्यांना निरोप दिला.

पुढे ठरल्याप्रमाणे त्यांनी ती ॲार्डर पुर्ण केली, आम्ही त्यांना बरेच रेफरन्सही त्यांना द्यायचो.

पुढे अचानक वर्षभराच्या आतच त्यांचा फोन सतत बंद येऊ लागला, वेळेवर मालाची डिलीव्हरीही थांबली. वेळेवर माल मिळत नसल्याने आमच्या परचेस विभागाने इतर ठिकाणाहून माल मागवला, ते माझे मित्र असल्याने कोणीही त्यांची तक्रार माझ्याकडे करत नव्हते. बरं मी ही कामात इतका व्यस्त असायचो की या या गोष्टीकडे माझे लक्षच गेले नाही.

एक दिवस कॅश-फ्लो चेक करताना शाम साहेबांच्या कंपनीऐवजी भलत्याच व्हेंडरला का बरं ॲार्डर देताय हा प्रश्न मी सहकाऱ्यांना विचारला तेंव्हा त्यांनी साहेबांबद्दल बराच नकारात्मक बाबींचा पाढा वाचला.

दुसऱ्याच दिवशी मी त्यांना फोन केला,पण त्यांच्याशी संपर्कच होईना, सतत चारपाच दिवस पाठलाग केल्यानंतर एक दिवस रात्री ११ वाजता साहेबांचा फोन लागला, मी प्रेमाने सर्व चौकशी केली परंतु ते दारूच्या नशेत असल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी डोंबिवलीतल्या त्यांच्या घराजवळ भेटायचे ठरवून फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी मी सकाळीच तिकडे गेलो त्यांना भेटलो तर त्यांची अवस्था पाहून मला धक्काच बसला. दाढी वाढलेली, डोळ्याभोवती काळी वर्तुळं, हात थरथरत होते, डोक्यावरचे केस पुर्ण विस्कटलेले आणि कपडे पुर्ण खराब झालेले. ग्रीस आणि फॅक्टरीतले डाग.

मी अवाक् होऊन गेलो, तशातही मी त्यांना आदराने अलिंगन दिले, त्यांच्या हाताला धरून माझ्या गाडीत बसवले आणि एका हॅाटेलमधे घेवून गेलो.

त्यांच्या डोळ्यात मला सर्व काही हरल्याचे भाव स्पष्ट दिसत होते. थोडा वेळ शांत बसल्यावर मी काहीच बोलत नाही हे ऐकून तेच स्वत:च म्हणाले – “टेक्निकल ज्ञान ऐकायलाच चांगले रे, आयुष्यात व्यवहारज्ञान पाहिजे!”
मी काहीच बोलत नव्हतो – त्यांच्या भावनांना वाट मिळावी म्हणून मी फक्त ऐकत होतो. पुढे ते म्हणाले – “जिद्दीने करायला गेलो पण पैशांचे गणितच जुळत नाही आता,प्रत्येक ॲार्डरमधे नुकसान होतेय.

तीनतीन महिने कामगारांना पगार नाही त्यामुळे बरेचसे सोडून गेले, त्यामुळे आता स्वत:च काम करतोय..
अकाउंट पाहू कि परचेस कि मॅन्युफॅक्चरींग की सर्व्हीस कि नविन धंदा आणू? लोकं काम देतात पण पेमेंट टर्म्स अजिबात पाळत नाहीत रे. वैताग आलाय!

कंपनी चालू करताना घर बॅंकेकडे दिले होते आता बॅंकेने जप्तीची नोटीस पाठवलीये म्हणून दिवसा फोन बंद ठेवतो नाहीतर त्यांचे लोक खुप त्रास देतात…
सेल्स टॅक्स भरू शकलो नाही त्यामुळे वेगळाच मनस्ताप. जुने कस्टमर पहिला टॅक्स भरा तर राहीलेले पैसे देऊ म्हणतात, आता घर चालवायलाच पैसे नाहीत तर हे कुठून भरू. त्यामुळे त्यांच्याकडील उधारीही मिळत नाही. इकडे नवा माल घ्यायला पैसे ही नाहीत आणि क्रेडीटही शून्य.”

“तुझ्या कंपनीतून मागे दोन लाख आले त्यात मुलांची शाळेची फी भरली, इतर घरचे खर्च केले त्यामुळे तुमच्या लोकांना माल देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांचेही फोन घेणे बंद केले. नविन ॲार्डर जरी आल्या तरी, आहे तोच मामला पुर्ण करायला आता पैसे नाहीत. काय करू, कसे करू काही सुचत नाही.

हल्ली तर दोन दोन दिवस घरीच जात नाही फॅक्टरीतच झोपतो. मला हे सर्व ऐकून त्यांचे जुने दिवस आठवले, किती जिंदादिल माणूस, हुशार, ज्ञानी. एकदम साधासुधा अगदी तुमच्या आमच्या घरातल्यासारखा.

मी काही ठाम विचार केला आणि तिथून थेट त्यांच्या फॅक्टरीत जायचे ठरवले.

तिथे जावून त्यांच्या ॲार्डर्स,कॅशफ्लो, खर्च, परचेस स्टेटमेंट आणि इतर सर्व आर्थिक बाबी तपासाव्या म्हणून त्यांना डिटेल्स मागितले तर चक्कर येऊन पडेल असे उत्तर मिळाले…

म्हणे गेली दोन वर्ष फायदाच नाही त्यामुळे हे असे एकत्र काहीच ठेवले नाही…अगदी विखुरलेला डेटा…काही डायरीज आणि कंप्युटरवर साध्या PO आणि जूजबी ॲार्डर्स…
मी जे भेटले ते एकत्र केले. त्याचा अभ्यास केला. आर्थिक अवस्था वाईट होती पण काहीतरी मार्ग काढू म्हटले.

त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी जे मोठे प्रोजेक्ट घेतलेले त्याच्या किंमती इतक्या कमी होत्या की त्यात फायदा मिळवायचा असेल तर डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागणार होते.

आपण मराठी लोक बऱ्यापैकी अघळपघळ असतो, फार बारकाईने विचारच करत नाही… त्यात उद्योग हा “फायदा” कमविण्यासाठीच केला जातो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मकच जास्त विचार करतो.

त्यांनीही यात काहीही लक्ष न दिल्याने अशाच आर्थिक संकटात अडकले होते.

मी जवळपास दोन तीन दिवस सर्व अभ्यास करून त्यांना काही सल्ले दिले… जी कामं होणारच नाहीत त्या लोकांना तसे स्पष्ट सांगा, काम करून हवे असेल तर रेट वाढवून घ्या आणि नव्याने सुरूवात करा असे ठरले.

एके दिवशी बॅंकेत मी स्वत: त्यांना घेऊन गेलो. तिकडेही सर्व परिस्थिती सांगितली आणि मुदतवाढ घेतली. फायनांस आणि अकाउंट्स
मध्येही बऱ्याच सुधारणा सांगितल्या. पुन्हा आमच्याकडून जी काही मदत करता येईल ती केली.

सर्व काही सुरळीत होईल असे मनोमन वाटत होते आणि दोनेक आठवड्यात अचानक एका कॅामन मित्राने सुन्न करणारी बातमी दिली “साहेबांनी आत्महत्या केली”

आता काहीच करू शकत नव्हतो. सुन्न झालो होतो.

“Business is a serious affair, Don’t do it for fun or just because others are doing” आर्थिकबाबी त्याचे परिणाम, धोके, तणाव पचवायाची ताकत असेल तरच पुढे या.

व्यावसायिक आयुष्य जितके सोपे, चकचकीत दिसते तसे ते नक्कीच नसते.

आर्थिक साक्षरता आणि पैशांचे नियोजन शिकाच!

प्रफुल्ल वानखेडे