कामात चॅलेंज स्विकारली की लढाईला खरी सुरूवात होते. वयाची २० ते ३० वर्ष खूप महत्वाची असतात भविष्याचा वेध घेण्यासाठी. उमेदीच्या काळात प्रत्येक तास महत्वाचा. त्यात मनोरंजन हवे पण मोठी झेप घ्यायची तर करियरटॉप प्रायोरिटीवरहवे.

आपल्याला खूप पुढे जायचे असेल, आर्थिक प्रगती करायची असेल आणि नवनव्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या कामावर श्रद्धा हवी. फक्त मजबुरी किंवा भीतीपोटी काम करता आनंदासाठी आणि स्वतःच्या संपूर्ण समाधानासाठी काम करायला हवे. जग जिंकायचे तर तसे प्रयत्नही करायलाच हवेत. या सर्वाचे दीर्घकालीन फायदे चक्रवाढ पद्धतीने आयुष्यभर मिळत राहतात. मनोरंजन महत्त्वाचे आहेच; पण कामधंदा सोडून फक्त राजकारण, निवडणूक निकाल, क्रिकेट, गावगप्पा, द्वेष, गॅासिप्स आणि सतत इतिहासात रमण्यापेक्षा नवी झेप घेण्याची तयारी करायला हवी. 

वर्ष २००३. क्रिकेट वर्ल्डकपची जोरदार हवा होती, त्यात भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार होते. सर्वांसारखाच मीही फुरफुरत होतो. मुंबईत मित्रांसोबत फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होतो. सततचे काम, प्रवास आणि वाचन यामुळे टीव्ही पाहण्यासाठी वेळ नसायचा, तो खरेदी करण्यासाठी पैसेही नसल्याने मोठा पेच पडला होता. हल्लीसारखे इंटरनेट, स्मार्टफोन किंवा इतर ॲानलाईन पाहता येईल, अशी कोणतीही सुविधा नव्हती.

काय करावे? कसे करावे? अशा विचारात सर्वच जण होते. आजूबाजूचेही शेजारी वा जास्त कोणी ओळखीचे नव्हते. त्यात आम्ही सर्व बॅचलर! लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजरच विचित्र. त्यामुळे कोणीही घरी घेणार नाही, याची ठाम खात्री होती. ओळखपाळख नसताना फक्त मॅच बघण्यासाठी एखाद्याच्या घरी एवढे सगळे जाणेही चुकीचेच. नातेवाईक किंवा इतर कोणाकडे जावे तर आयुष्यभर त्या मॅचचे उपकार आणि टोमणे कोणालाच नको होते. मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की, आपण वर्गणी काढून टीव्ही विकत घेऊ या आणि आपल्यापैकी ज्याचे लग्न शेवटी होईल, त्याला तो लग्नात भेट म्हणून देऊ या!

खरेदीची जबाबदारी माझ्यावर आली. आधी टीव्ही केबलसह घरी विराजमान केला. दोन दिवस चर्चा फक्त एकच, भारत-पाकिस्तान मॅच, सचिन, शोएब, सौरव, द्रविड. दुसऱ्या दिवशी मॅच होती. उद्या काय करायचे हा प्लॅन तयार होता. लहानपणीसारखे परीक्षेचा अभ्यास कर, हे काम कर, ते काम कर हे सांगायला आई-बाबा किंवा भाऊ-बहीण येणार नव्हते. उगीचच कोणी टोमणे मारणारे किंवा टीव्ही पाहायला दुसऱ्याच्या घरी गेल्यावर हिडीसफिडीस करणारेही नव्हते. आता आमचा स्वतःचा, स्वतःच्या मालकीचा टीव्ही घरात होता. रात्री आम्ही मित्र गोल बसून एकत्र जेवण करत होतो. माझा मोबाईल वाजला.

फोनच्या स्क्रिनकडे बघतो तर मी मागच्याच आठवड्यात ज्यांचा पावडर कोटींगचा प्लांट चालू करून दिला होता, त्याचे मालक स्वत: फोन करत होते. फोन उचलला. ते म्हणाले, ‘‘संपूर्ण प्लान्ट बंद पडलाय आणि कोणालाच समजत नाही नक्की काय झालेय? उद्या जर माल डिलीव्हर झाला नाही तर सिमेन्स त्यांची संपूर्ण ॲार्डर रद्द करू शकते. त्यामुळे आत्ताच्या आता वसईला जाऊन रात्रीत तो चालू करून दे.’’

माझा तोंडातला घास तोंडातच अडकला. काय करावे काहीच समजत नव्हते. सगळे मित्र ओरडायला लागले – तू फोनच का घेतला? काहीही कारण सांग, पण आता जाऊ नकोस. मलाही तसेच वाटले. म्हटले, मध्यममार्ग काढू. फोनवरच प्रॅाब्लेम सोडवून टाकू. त्यांच्या फॅक्टरीचा नंबर माझ्याकडे होताच. मी फोन लावला आणि त्यांच्या मॅनेजरसोबत बोललो, तर तेही अत्यंत तणावाखाली असल्याचे जाणवले. दुसऱ्या कोणाला काही समजत नव्हते आणि भीतीही होती. कारण तो त्यांच्यासाठी गॅसवर चालणारा पहिलाच प्रकल्प होता. त्यांनी हात लावला व काही अजून बिघडले तर मालक ओरडणार, याची कदाचित भीतीही असावी.

मी वसईत राहणाऱ्या एका सहकाऱ्याला विचारले, पण त्यानेही मॅचमुळे साईटवर जाण्यास स्पष्ट नकार दिला. इतर सर्व्हिस इंजिनियर्सचेही फोन स्विच ॲाफ येत होते. सर्वांनी अगदी प्लानिंग करून आधीच काळजी घेतली होती बहुतेक. मला काय कळायचे ते कळले. मीच तो प्लांट पूर्ण चालू करून दिल्याने तसेच नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रोजेक्ट्स आणि त्यांचा सर्व्हिस इंजिनियर असल्याने त्यांना वेळेवर सर्व्हिस देणे, ही माझी जबाबदारी होती. सर्व्हिस इंजिनियरचे जगणे हे डॅाक्टरसारखे असते. कोणत्याही वेळी कॉल येतो आणि त्यावेळेस आपण हजर असणे आत्यंतिक गरजेचे असते. अशा अडचणीच्या वेळी एखाद्याला टाळणे हे प्रोफेशनली तर चूक आहेच; पण नैतिकदृष्ट्याही पाप आहे.   

मी सरळ रात्री ११ ला साईटवर जायचा निर्णय घेतला. मित्रांना सांगितले सकाळी मॅच सुरू होईपर्यंत मी परत आलेला असेन, पण आता मला जायलाच हवे. मी त्या कस्टमरला फोन केला. तुम्ही काळजी करू नका, मी स्वत: निघालोय आणि सकाळपर्यंत प्रॉडक्शन काढून देतो. स्टेशनला गेलो. ट्रेन पकडली आणि पुढे रात्री रिक्षाने त्यांच्या फॅक्टरीत पोहचलो. सर्व लोक माझ्याकडे रागाने पाहत होते (जणू हाच तो ज्याने आमच्या मालकाला आणि आम्हाला गंडवलेय). बरं त्यात त्या कामगारांच्या मनात गॅसची भीती वेगळीच.

मी रात्री दोन वाजता काय नक्की झालेय, याचा शोध घ्यायला ओव्हनवर चढलो. बर्नर, ब्लोअर, पॅनेल गॅसबॅंक सर्व पाहिले. मी सिस्टीम चालू करतानाच्या सेटिंग्ज लक्षात होत्या. कारण नुकताच तो प्रोजेक्ट चालू केला होता. काही गोष्टींच्या सेटींग कामगारांनीच बिघडवलेल्या लगेच लक्षात आल्या. त्याचे कारणही लक्षात आलेच, उद्याची मॅच – दुसरे काय!

मी सर्व सुरळीत करतच होतो, तेवढ्यात त्या कंपनीचे मालक स्वत: फॅक्टरीत दाखल झाले. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला, मग पटापट सर्व सेटींग चेंज करून साधारणत: पहाटे चार वाजता प्लांट सुरू केला. स्वत: त्या कंपनीचे मालकच फॅक्टरीत आल्याने कोणताही कामगार आता गडबड करण्याचा प्रश्नच नव्हता. मॅनेजरनेही खाजगीत कबूल केले की, काही नाठाळ लोकांनीच हा प्रकार मुद्दाम केला होता. प्लांट पुन्हा अगदी व्यवस्थित सुरू झाला.

प्रॉडक्शन सुरू झाल्यामुळे मी निघणार एवढ्यात पुन्हा एकदा सायरन वाजला आणि ओव्हन बंद झाली. मी शांतपणे पुन्हा कामाला लागलो; पण यावेळी मला काही समजतच नव्हते. ते मालक माझे अगदी बारीक निरीक्षण करत होते. ते खूप रागावलेले दिसत होते. त्यात काही कामगार त्यांना आमच्या डिझाईनविषयी, माझ्या कमी अनुभवाबद्दल आणि कौशल्याबद्दल मुद्दाम शंका उत्पन्न होईल, असे टोमणे मारत होते. मी मग इरेला पेटलो. काहीही झाले तरी आता माघार नाही, चवताळून गेलो… पुन्हा दोन तासांत सर्व व्यवस्थित करून प्लांट अगदी व्यवस्थित चालू केला आणि ओव्हनवरच अशी जागा शोधली जिथून मला सर्व फॅक्टरी दिसेल आणि तिथेच खुर्ची टाकून बसलो.

जे कामगार काड्या करत होते, त्यांना काय कळायचे ते कळाले! मी अगदी डोळ्यांत तेल घालून निरीक्षण आणि सूचना करत होतो. काही झाले तरी पूर्ण लोड संपल्याशिवाय फॅक्टरी सोडायची नाही, हे अगदी मनोमन ठरवले. मालक नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला स्वत: बोलवायला येऊनही मी वरच थांबलो. रात्री सर्व प्रॉडक्शन पूर्ण झाल्यावरच खाली उतरलो. माझे डोळे लाल झालेले. हात काळेकुट्ट. कपड्यांची तर विचारता सोय नाही. मी लोखंडी लॅडरवरून खाली उतरून चालायला लागलो, तेवढ्यात मालक सामोरे आले. अशा अवस्थेत त्यांनी मला कडकडून मिठी मारली. डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘‘शेर निकला तू तो, बहोत खूब.’’ ते सर्व कामगारही ओशाळले होते.

त्यांनाही पश्चाताप झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मी कोणतीही तक्रार न करता तिथल्या सर्वांचे आभार मानले. त्यांनीही सर्वांनी आमचे डिझाईन उत्तम असल्याचे मान्य केले. मालक मात्र खूप खुष होते. स्वत: त्यांच्या कारमधून मला सोडायला कांदिवलीला आले. उतरतानाही त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. रात्री उशिरा घरात पाऊल टाकले. सर्व मित्र भारत-पाकिस्तान विजयाचा आनंद साजरा करत होते. ते सचिन आणि मॅचचा इतिवृत्त सांगत होते आणि मी मात्र क्रिकेट पूर्णपणे विसरलो होतो. दिवसभरात एकदाही मला त्याची आठवण झाली नव्हती. माझ्यापुढचे संकट त्यापेक्षा कैकपट मोठे होते. त्यामुळे मला त्या मॅचबद्दल, टीव्हीबद्दल काहीच वाटत नव्हते. त्या दिवशी आयुष्याचे नवे गणित सुटल्याचा धडा घेतला होता, आमची पण भारत-पाकिस्तान सारखीच मॅच होती, जी आम्ही त्या दिवशी जिंकलो होतो!

मला माझे ध्येय स्पष्ट दिसत होते. जर त्या क्रिकेट मॅचच्या नादात मीही गेलो नसतो तर कंपनीचे आणि पर्यायाने माझेही नाव कायमस्वरूपी खराब झाले असते. पुढे आमच्या कंपनीच्या गुडविलवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. आमच्या कस्टमरची कंपनी कदाचित ब्लॅकलिस्ट झाली असती तर ते सर्व कामगार नक्कीच तिथून बेरोजगार झाले असते. एवढे पैसे, संपत्ती असतानाही ते मालक रात्री स्वत: येतात, यात खूप काही आले. क्रिकेटमुळे मला कदाचित काही तासांचा आनंद (जिंकलो तरच) मिळाला असता; पण इथे मला आयुष्यभराचा मोठा धडा भेटला. आयुष्याच्या प्रवासात कितीही आमिषं, संकट, अडथळे आले तरी अंतिम ध्येय जे असेल, त्याच दिशेने आपली पावले आणि कर्म असायला हवे.

आपल्याला खूप पुढे जायचे असेल, आर्थिक प्रगती करायची असेल आणि नवनव्या गोष्टी शिकायच्या असतील तर अर्ध्या हळकुंडात पिवळे होण्याची संस्कृती बदलायला हवी. आपल्या कामावर श्रद्धा हवी. फक्त मजबुरी किंवा भीतीपोटी काम न करता आनंदासाठी आणि स्वतःच्या संपूर्ण समाधानासाठी काम करायला हवे. या सर्वाचे दीर्घकालीन फायदे चक्रवाढ पद्धतीने आयुष्यभर मिळत राहतात. मनोरंजन महत्त्वाचे आहेच; पण काम-धंदा सोडून फक्त राजकारण, निवडणूक निकाल, क्रिकेट, गावगप्पा, द्वेष,गॅासिप्स आणि सतत इतिहासात रमण्यापेक्षा नवी झेप घेण्याची तयारी करायला हवी. जग जिंकायचे तर तसे प्रयत्न करायलाच हवेत. पुढे त्या उद्योजकांनी आणि मीही ते संबंध आजपर्यंत जपले. त्यांनी कितीतरी नवे रेफरन्स आम्हाला दिले. पुढेपुढे ते अगदी आमचे कौटुंबिक मित्रही झाले.